शुक्रवार, अप्रैल 02, 2010

मरिना बीचवरची ती रम्य संध्याकाळ ...

स्थळ्: मरिना बीच (चेन्नई)
वेळ्: संध्याकाळची
साल्: १९८८
पात्रे: २५ मर्द मराठा..

... तर त्याचं असं झालं की आम्ही " educational tour " (ह्यात काय करतात हे सगळ्यांना माहित आहे..) वर "साऊथ" ला गेलो होतो.. बस आमच्याच college ची होती..
तिरुपतीच्या बालाजी चे दर्शन घेऊन (इथुन पुढे beautiful "दर्शने" होऊ दे असे मागणं मागून) आम्ही चेन्नई (तेव्हाचे मद्रास) कडे कूच केले.
तिथल्या agriculture college च्या कुठल्याश्या hostel वर आमची व्यवस्था (कशीबशी) "लावून" दिली होती... (रात्री डासांनी आमची "अवस्था" केली होती.) असो..
दुसर्‍यादिवशी सकाळचे सगळे कार्यक्रम "व्यवस्थित" आटोपून.. (हो व्यवस्थितच... प्रवासात सकाळी व्यवस्थित "होत" नसते...) महाबलीपुरम, सर्पोद्यान आणि इतर काही ठिकाणे पाहून आम्ही मरिना बीचवर संध्याकळी सहाच्या सुमाराला दाखल झालो... बस तिथल्या वाळूतच पार्क करून ठेवली... एव्हाना आमच्यातल्या बर्‍याच जणांचा उत्साह वाढला होता.. त्यातून ( I mean त्यांच्या चाळ्यांतून) ते नक्कीच माकडाचे वंशज आहेत हे प्रकर्षाने जाणवत होते... (अशा लोकांची खरी गरज इथेच असते.. तेवढीच गम्मत..). आम्ही तिकीट काढून आत गेलो.. आत गेल्यावर आधी डोसा, ईडली इ. जे काही समोर येईल ते हादडले.. आता पोटात गेले होते... "कुछ खत्रा (इकडच्या भाषेत "जबरी") करके दिखाने का" चा किडा डोक्यात वळवळायला लागला... तसेच इकडे तिकडे भटकत राहिलो... कुठेच काही " beautiful " दिसले नाही... शेवटी एके ठिकाणी थबकलो.. तिथे फर्माईशी orchestraa चालू होता. थोडावेळ थांबलो.. म्हणलो सुनेंगे कुछ.. (इथे मात्र " beautiful " होते..).. सगळ्या फर्माईशी "यन्गडतु" गाण्यांच्या... ओ की ठो कळत नव्हते... आमच्यातला एक जण हिम्मत करून stage वर गेला अन् विचारले " will u sing hindi songs? " "येस" असे उत्तर आले... लग्गेच "एक दो तीन" ची फर्माईश केली गेली (त्यावेळी आपल्या दिक्षितबाई भलत्याच जोरात होत्या). त्यांनी मान्य केली.. आम्हाला भलताच आनंद झाला..
आम्ही वाट पाहू लागलो.. हे आता म्हणतील.. मग म्हणतील.. आमच्या समोर इतरांची पसंती स्वीकरली जाऊन त्यांची गाणी (यंगडतु..) म्हणली जात होती पण "एक दो तीन" चा काही "नंबर" लागत नव्हता.. आमच्यातला एक जण परत त्यांना विनंती करून आला... ते पण "लग्गेच" म्हणतो असे म्हणाले... आम्ही खुश... परत एक नवीन यंगडतु फर्माईश... ती पण स्वीकारली गेली... आम्ही संतप्त... त्यातच गर्दीतल्या एकाने सुनावले "तुमारा गाना वो नई गाता... हमारा तमील गाना ही वो गायेगा.. हम सब इतने लोग है हमारा उसको सुनना पडेगा.. तुम्हारा कौन सुनेगा?"... त्यातच त्यानी आम्हाला खिजवण्यासाठी परत एक नवी फर्माईश केली... ती स्वीकारली गेली सुद्धा... झाले आमची टाळकी फिरली ३०० च्या जमावा समोर आम्ही २५ जण "तेजाब", "तेजाब", "मोहिनी", "मोहिनी" ओरडू लागलो अन् एकच गोंधळ सुरु झाला त्यांना त्यांची गाणी ऐकता येईनात.. शेवटी.. "ओ तुम चुप बैठो.. तुमारा गाना वो गानेवाला है" असे कुणी तरी सांगितले. आम्ही ऐकले तो खरंच त्याने एक दो तीन चालू केले... मग आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग जो नाच चालू झाला... २५ लोक "तुमच्यावर आम्ही तुमच्या गल्लीत विजय मिळवला आहे" याच भावनेने नाचत होते.. ते गाणे बाजूलाच राहिले... शेवटी ते गाणे संपले अन् बीच ची वेळ संपली आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेर पडत असताना एका तामिळी टोळक्याने आम्हाला विचारले "तुम्ही कुठचे?" आम्ही, "महाराष्ट्र" असे ठणकावून सांगितले. "तुम लोग ग्रेट हो यार" त्यांच्यातला एक जण.. आम्ही बाहेर आलो रात्रीचे ८ वाजले होते... जाम भूक लागली होती.. आम्ही सर्वजण घामाने निथळत होतो अन् त्यातच एक शुभ वार्ता कळाली... बस वाळूत फसली आहे.. डोक्याच्याही वर असलेली मागची खिडकी ("आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग") आता छातीच्याही खाली गेली होती. पोटात भीतीचे गोळे आले..
बाहेर आलेले "ते" लोक म्हणत होते "आत फार माज आला होता ना तुम्हाला? घ्या आता..." आम्हाला हसत होते... त्यातला एकहि जण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हता... अगदी १०० / २०० चा जमाव जमला होता आमच्या भोवती. आमची कशी जिरली याचा आनंद घेत होता..
आम्ही सुरुवातीला बसला धक्का मारण्याचा प्रयत्न केला...बस ढिम्मच...तिकडे ड्रायव्हर गिअर वर गिअर बदलत होता...
मागची दोन्ही चाके जागीच गरारा फिरत होती... वाळू बकाबका नाकातोंडात जात होती... पण बस काही हलत नव्हती..
एकाने सांगितले... चेन्नईला जा. तिथून क्रेन आणा अन् बस काढा.
शेवटी सगळ्यांनी ठरवले... आपणच बस काढायची...सगळे बसच्या मागे आले..."हर हर महादेव..." "जय भवानी जय शिवाजी.." च्या घोषणांनी तो परिसर परत दणाणला..आता चार पाचशे लोक तरी जमले होते...एक बाप्या मदतीला येईल तर शपथ...आमच्या घोषणा चालूच होत्या... आता बस जागीच हलत होती... आम्ही धक्के देऊन बसला जोरजोरात हलवत होतो.. डोक्यात, कानात नुसती वाळूच वाळू झाली होती...वाळू थुंकून थुंकून बेजार झालो होतो...शर्टात वाळू गुदगुल्या करत होती..आता बस बरीच मोकळी झाली होती...आता एक शेवटचा भीमटोला द्यायचे ठरले.. परत एकदा "हर हर महादेव" ने परिसर दणाणला...जोरदार धक्का दिला गेला अन् बस दुसर्‍या क्षणी बाहेर आली
आमचा आनंद गगनात मावत नव्हता... नुसत्या उड्या मारत होतो...एकमेकांना मिठ्या मारत होतो... हेच दाखवून देत होतो की आम्ही मर्द मराठा आहोत...कुणावाचून आमचे अडत नाही...जमलं तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय असा आमचा बाणा असतो...जिथे जाऊ तिथे स्वत:चे स्थान निर्माण करतो...
तिथल्या एका टोळक्याने चक्क हात जोडले (मगाशी तुम्ही कुठचे असे विचारणारे हेच ते टोळके..)
शेवटी त्याच गर्दीतल्या तिघाचौघांना घेऊन आम्ही चेन्नई ला प्रयाण केले...
फ्रेश होऊन जेवून झोपलो... पण झोप येत नव्हती...
त्यांच्या नाकावर टिच्चून केलेला एक दो तीन चा नाच डोक्यातून जात नव्हता..


http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=119403&post=809382#POST809382

1 टिप्पणी:

विशाल विजय कुलकर्णी ने कहा…

मुजरा सरकार !